तब्बल ३३ कोटींची वाढीव रसद; ना. सामंत यांचा पाठपुरावा
रत्नागिरी:- जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेल्या सन २०२६-२७ च्या विकास आराखड्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीने सुरुवातीला ४०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, मात्र मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निधीमध्ये आणखी ३३ कोटी रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता आगामी वर्षात जिल्ह्याच्या वाट्याला एकूण ४३९ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक गरजा आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जादा निधीची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन सरकारने ३३ कोटी रुपये वाढवून दिले आहेत. या वाढीव निधीमुळे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांना मोठी गती मिळणार आहे. पालकमंत्र्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला हा भरघोस निधी पदरात पाडून घेता आला आहे.
मात्र, एकीकडे नव्या वर्षाचा निधी मंजूर झालेला असतानाच, जिल्हा प्रशासनासमोर चालू आर्थिक वर्षातील (२०२५-२६) शिल्लक निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मार्च महिना संपायला आता काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. नियमानुसार, जर हा मंजूर निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाला नाही, तर तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा लागतो. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सध्या या निधीचा विनियोग करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करून दिलेला निधी वेळेत खर्च व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समिती आता युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.









