Saturday, July 11, 2026
spot_img
Home आर्थिक जिल्हा बँकेकडून 1 हजार 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांचा टप्पा पार

जिल्हा बँकेकडून 1 हजार 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांचा टप्पा पार

रत्नागिरी:- आजच्या वेगवान डिजिटल युगात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक नवा इतिहास रचला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला आधुनिक बँकिंगच्या प्रवाहात आणत बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात थेट १०१५ कोटी रुपयांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांचा टप्पा पार केला आहे. तंत्रज्ञानाचा हा ‘रत्नागिरी पॅटर्न’ केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता, थेट कोकणातील गावागावांत आणि वाड्यावाड्यांवर पोहोचला असून ग्राहकांनी या डिजिटल क्रांतीला भरघोस प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये एकट्या UPI द्वारे तब्बल ७९१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून ग्रामीण भागातील जनताही आता रोखीऐवजी सुरक्षित डिजिटल पेमेंटला पसंती देत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानाचा सातत्याने प्रचार व प्रसार केला आहे. आज बँकेच्या माध्यमातून एटीएम, मोबाईल बँकिंग, UPI, IMPS, QR कोड आणि अगदी दुकानांमध्ये दिसणारे ‘QR साऊंड बॉक्स’ यांसारख्या अत्याधुनिक सुविधा ग्राहकांच्या सेवेत हजर आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांना कधीही आणि कुठूनही अगदी सहज व सुरक्षितपणे आपले पैशांचे व्यवहार करता येत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या बँकेच्या शाखांनी डिजिटल बँकिंगचा हा प्रवाह सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये प्रत्यक्ष डिजिटल व्यवहारांचे प्रात्यक्षिक दाखवणे, ग्राहक मेळावे घेणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे आयोजित करणे आणि डिजिटल साक्षरता उपक्रम राबवणे अशा विविध माध्यमांतून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यात आली. बँकेच्या फिरत्या एटीएम व्हॅनने (Mobile ATM Van) तर दुर्गम भागात जाऊन सेवा दिल्यामुळे लोकांचा या व्यवहारांवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.

ग्राहकांच्या खात्याची आणि कष्टाच्या पैशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी बँकेने ‘एसएमएस अलर्ट’ सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे खात्यातून होणाऱ्या प्रत्येक बारीक-सारीक व्यवहाराची माहिती ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर त्वरित मिळते. याशिवाय, कोणत्याही सायबर हल्ल्यापासून किंवा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण व्हावे यासाठी २४ तास आणि सातही दिवस (२४X७) विशेष देखरेख व नियंत्रण ठेवले जाते. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल ते ३० जून २०२६ या अवघ्या तीन महिन्यांच्या काळात झालेल्या व्यवहारांवर नजर टाकल्यास, मोबाईल बँकिंगद्वारे ३.०४ कोटी, UPI द्वारे २६८.१० कोटी, QR कोडद्वारे ८.२९ कोटी, IMPS द्वारे १७.३२ कोटी आणि एटीएमद्वारे ३४.०९ कोटी रुपयांचे व्यवहार पूर्ण झाले आहेत.

या अभूतपूर्व यशाबाबत बोलताना बँकेचे अध्यक्ष आणि कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्राहक आणि शेतकऱ्यांना ७६ शाखांच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहे. ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक बँकिंग सेवा मिळावी यासाठी बँक कटिबद्ध आहे. डिजिटल व्यवहारांमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून त्यांचे व्यवहार अधिक सुरक्षित होत आहेत. भविष्यातही ग्राहकांच्या गरजेनुसार आणखी नवनवीन डिजिटल सुविधा आणल्या जातील. सध्या बँक ११ एटीएम केंद्रे आणि ३ फिरत्या एटीएम व्हॅनद्वारे सेवा देत असून, लवकरच ‘AEPS’ (आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम) सेवेचा शुभारंभ करून डिजिटल क्षेत्रात आणखी एक पुढचे पाऊल टाकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हा बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सहकार क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावली असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बँकेच्या कर्ज, ठेव आणि विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.