रत्नागिरी:-जिल्हा परिषद भवनात गुरूवारी दोन कोरोनाबाधित कर्मचारी सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासकीय कार्यालयात 50 टक्के उपस्थितीच्या आदेशाचे पालन जिल्हा परिषद करणार का याबाबत तर्कवितर्क लढविले जात असताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोरोनाबाबतची नियमावली 17 मार्चला जारी केली आहे.
त्यातील सुचनेनुसार सर्व कार्यालये, आस्थापना 50 टक्के क्षमतेच्या अधीन राहून सुरू राहतील. घरातून काम (वर्क फॉर्म होम) करण्याबाबत प्रोत्साहित करणे, योग्य रितीने मास्क परिधान न केल्यास प्रवेशास परवानगी देऊ नये, तापमान मोजण्याचे साधन प्रवेशद्वारावर उपलब्ध करून ठेवावे, सोशल डिस्टनिंगचे पालन करावे आदी या आदेशात नमूद केले आहे. पन्नास टक्के उपस्थितीबाबत आरोग्य व इतर अत्यावश्यक आस्थापना वगळण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेत गुरूवारी दोन कोरोना रूग्ण सापडल्याने कर्मचार्यांनी धास्ती घेतली आहे. त्यानंतरही जिल्हापरिषदेतील कर्मचारी उपस्थितीबाबत अजुनही नियोजन करण्यात आलेले नाही. मार्च अखेर असल्यामुळे सर्व कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर्मचार्यांना बोलावण्यात येत आहे. तसेच बदली सुट्टी घेऊ नयेत अशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हजेरीसाठी बायोमेट्रीकचा वापर सुरुच आहे. जिल्हा परिषदेत येणार्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी सुरु आहे. अत्यावश्यक असेल तरच प्रवेश दिला जातो. असे असले तरी गेल्या दोन दिवसात दररोज दीडशेहून अधिक लोकं कार्यालयात येऊन गेले आहेत. त्यांची नोंद केली आहेत.