जलजीवन मिशनची कामे निधीअभावी ठप्प

रत्नागिरी:- जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेची कामे सध्या निधी अभावी ठप्प झाले आहे. ठेकेदारांनीसुद्धा जोपर्यंत निधी मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ठेकेदारांनी निवेदन दिले आहे.

केंद्र शासनाच्या हर घर नल योजनेतून प्रत्येक कुटुंबात प्रती माणसी ५५ लिटर पाणी देण्यासाठी जलजीवन मोहिमेचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन प्रकल्पाअंतर्गत १४३२ पाणीपुरवठा योजनांपैकी फक्त ४३९ योजनांचे काम पुर्ण झाले आहे. उर्वरीत योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी सन २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. पंरतु त्या कालावधीत काम पुर्णन झाल्याने याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यात सुमारे ७० कोटी रुपये आवश्यक आहे. मात्र, गेल्या अनेक महिने निधी न आल्याने ही कामे रखडली असून ठेकेदार अडचणीत आली आहेत. या बाबत ठेकेदारांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काम बंद करत आहोत असे निवेदन दिले आहे. आमच्यावर कर्ज झाले असून उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.