चांदोरमध्ये किरकोळ वादातून वृद्धाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर उगवतीवाडी येथे किरकोळ वादातून वृद्धाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शामकांत महादेव चांदोरकर (६८, रा. चांदोर रत्नागिरी) असे मारहाणीत जखमी झालेल्यांचे नाव आहे. शामकांत यांनी मारहाण प्रकरणी पूर्णगड पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी रितेश प्रकाश तांबे (२०, रा. चांदोर रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी सकाळी शामकांत हे गुरे चरविण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी गुरांची झुंज होऊ नये यासाठी शामकांत यांनी रितेश याला आपली गुरे बाजूला घे असे सांगितले. याचा राग आल्याने रितेश याने लाकडी काठीने शामकांत यांना मारहाण केली. अशी तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी रितेश याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम ११८(१), ११५(२),३५२,३५१ (२) (३) नुसार गुन्हा दाखल केला.