गोवंश हत्या प्रकरणी संशयिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी

रत्नागिरी:- मिरजोळे-एमआयडीसी येथे गोवंश हत्या प्रकरणी संशयिताकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत असून ‘त्या’ संशयिताच्या पोलिस कोठडीत आज न्यायालयाने आणखीन पाच दिवसांची वाढ केली आहे.

शादाब गनी बलबले (वय ३०, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ४ जुलैला रात्री आठच्या सुमारास एमआयडीसी मिरजोळे येथील रस्त्यावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर गोमासांची वाहतूक करत असताना अज्ञात वाहनातून पडलेले निदर्शनास आले होते. या प्रकारानंतर शहर लगतच्या परिसरातील नागरिकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात धाव घेतली. दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यावेळी पोलिसांनी तपासात संशयितास अटक केली. न्यायालयाने संशयित बलबले याला पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांच्या तपासात संशयिताने गुन्हा केला नसल्याचा स्पष्ट करत आहे. त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या वडिलांचा मागील ३० ते ३५ वर्षाचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांच्याकेड गाई, म्हशी पाळलेल्या आहेत तसेच गनी बलबले यांचा गाई म्हशी विक्रीचा व्यवसाय सांगत आहे. पुढे पोलिसांच्या तपासात पोलिसांनी संशयिताच्या वेतोशी येथे जनावरांच्या गोठ्यात जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी एक गाय, १ म्हैस, व आठ बैल असे बांधून ठेवल्याचे दिसून आले. तसेच जनावरांच्या गळ्यास नायलॉन दोरीने करकचून बांधले होते. तसेच जनावरांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. मात्र घटनास्थळी गोवंश प्राण्याचे मुंडके मिळून आले होते. संशयिताने गोवंश भागाची कशी विल्हेवाट लावली. मांस कोठे विकले, वापरलेले हत्यार तसेच गोवंश प्राण्याची हत्या केली ते कोठून प्राप्त केले या बाबतही संशयित उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अजूनही तपास बाकी असल्याने संशयिताला आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारी (ता. १५) तारखेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.