गणपतीत कोकणात बोटीने; मुंबई-रत्नागिरी तीन तासात

रत्नागिरी:- यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोकणवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केली.

मंत्री राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लवकर सागरी प्रवासाचा पर्याय खुला होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग M2M फेरी लवकरच सुरू होणार आहेत. यामध्ये एकावेळी ५०० प्रवाशांसह १५० गाड्या वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. तसेच मुंबई ते विजयदुर्ग प्रवास अवघ्या ४.५ तासात तर मुंबई ते रत्नागिरी अवघ्या तीन तासात करता येणार” असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार, अशी मोठी घोषणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार असल्याचे ही आता पुढे आले आहे.