खोल विहिरीत अडकलेल्या अजगराच्या पिल्लाची सुटका

चिपळूण:- दोन दिवसांपूर्वी तनाळी येथील विक्रांत टेरवकर व सिद्धेश डिंगणकर यांनी वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून विहिरीत अजगराचे पिल्लू अडकल्याची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व सर्पमित्र प्रथमेश पवार, प्राणीमित्र जाकिर परकार व जिल्हा कार्याध्यक्ष अमित जाधव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

विहिरीत सुमारे १० ते १५ फूट पाणी असल्याने अजगरास तात्काळ पकडणे शक्य नव्हते. विविध उपाययोजना करूनही यश न आल्याने विहीर रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिंगणकर यांच्या सहकार्याने दोन दिवसांत विहीर पूर्णतः खाली करण्यात आली. त्यानंतर सर्पमित्र प्रथमेश पवार यांनी विहिरीत उतरून अजगर पिल्लास सुरक्षितरीत्या पकडले.

या घटनेची माहिती रामपूर बीटचे वनरक्षक राहुल गुंठे यांना देण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत सदर अजगरास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. या यशस्वी बचाव कार्यामुळे ग्रामस्थांसह उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला. हे बचाव कार्य वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष शुभम पांडे, राज्याध्यक्ष अभिजित वाघमोडे, अनिल राऊत, रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रोहित यादव, जिल्हासचिव प्रसाद विचारे, उपजिल्हा सचिव निलेश पडवेकर व निलेश बुरटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या रेस्क्यूवेळी सर्पमित्र प्रथमेश पवार, जाकिर परकार, अमित जाधव, विक्रांत टेरवकर, सिद्धेश डिंगणकर, गोवळकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी नागरिकांना साप व वन्यजीवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोणताही साप, वन्यजीव, पशु किंवा पक्षी अडचणीत किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी तात्काळ महाराष्ट्र वनविभागाच्या १९२६ हेल्पलाइनवर किंवा वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी संस्थेच्या ९३५६११८४३८, ९५२७४१५५६०, ९८३४६६५९१६, ८२९१२१७१९१, ९७६८०१२५६३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.