खेड:- मासेमारीसाठी धरणावर गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. प्रसाद प्रदीप आंब्रे (वय २८, रा. माणी, आंब्रेवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मासे पकडताना पाण्यात तोल गेल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ही घटना दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या पूर्वी लवेल शेलारवाडी धरणात घडली.
मयत प्रसाद आंब्रे यांना धरणावर मासे मारण्यासाठी जाण्याची सवय होती आणि ते नियमितपणे या धरणावर मासे पकडण्यासाठी जात असत. घटनेच्या दिवशीही ते मासेमारीसाठी धरणावर गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रसाद आंब्रे यांच्याशी त्यांच्या कुटुंबीयांचा गेल्या दोन दिवसांपासून संपर्क झालेला नव्हता. त्यांचा भाऊ आणि खबर देणारे प्रशांत प्रदीप आंब्रे यांनी पोलिसांना कळवले की, त्यांचा भाऊ प्रसाद हा लवेल शेलारवाडी धरणावर मासे पकडण्यासाठी गेला असावा.
वरील तारखेस व वेळेस प्रसाद आंब्रे हे धरणाच्या पाण्यात मासे पकडत असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते पाण्यात पडले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडून मयत झाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
मृताचा मृतदेह सापडल्यानंतर तो पुढील प्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी, ता. खेड येथे हलवण्यात आला. दि. २३/०९/२०२५ रोजी सायंकाळी १६.०३ वाजता खेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची आमृत्यू नोंद क्रमांक ९५/२०२५ नुसार बी.एन.एस.एस. १९४ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) प्रमाणे नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मासेमारीच्या छंदाने एका तरुणाचा हकनाक बळी घेतल्याने माणी आणि शेलारवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.