रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील खेडशी नाका येथे बुधवारी (दि. ३० एप्रिल २०२५) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आंबा पेट्या देऊन परतणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली. गाडीच्या ताडपत्रीच्या कारणावरून झालेल्या या मारहाणीत सुमित उर्फ सिद्ध रमेश चव्हाण (वय १९, रा. मिरकरवाडा) आणि इस्माईल नदाफ हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिद्धेश प्रकाश रसाळ, संदेश मारुती रसाळ (दोघे रा. नाचणे, रत्नागिरी) आणि दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित चव्हाण आणि त्यांचा मित्र इस्माईल नदाफ हे पालघर येथे आंबा पेट्या व्यापाऱ्यांना देऊन हातखंबा मार्गे रत्नागिरीला परत येत होते. खेडशी नाक्याजवळ असताना आरोपी क्रमांक १ ते ४ यांनी त्यांच्या गाडीच्या ताडपत्रीच्या कारणावरून वाद घातला. यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचे मित्र इस्माईल यांना लाकडी काठी आणि हाताच्या ठोश्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीत जखमी झालेल्या सुमित चव्हाण आणि इस्माईल नदाफ यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, आरोपी सिद्धेश रसाळ आणि संदेश रसाळ याच्यासह दोन अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे.