खवल्या मांजराच्या खवलेची तस्करी, एकाला अटक

एलसीबी, वन विभागाची कारवाई; खवले, दुचाकी जप्त

संगमेश्वर:- खवल्या मांजरांच्या खवलेची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला रत्नागिरी तालुक्‍यातील बावनदी येथे सापळा रचून पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभाग यांनी ही संयुक्त कारवाई केली. त्याच्याकडून खवले आणि दुचाकी जप्त करण्यात आली. संशयिताला काल शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

राकेश रामचंद्र धुळप (वय २७, रा. देऊळवाडी, ता. लांजा) असे पकडण्यात आलेल्या संशोधकाचे नाव आहे. त्याच्याकडून चार किलो 336 ग्रॅम वजनाची खवल्या मांजराची खवले जप्त करण्यात आले आहेत. खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने आणि वन विभागाने सापळा रचला. संशयित मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी ते पाली या दरम्यान येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संशयास्पद फिरणाऱ्या एका दुचाकी स्वाराला थांबवून त्याची चौकशी केली. तेव्हा खवल्या मांजराच्या तस्करीचा हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिस हवालदार शांताराम मोरे यांनी तक्रार दिली असून तक्रारीवरुन राकेश धुळप याला अटक केली आहे. सायंकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता पाच तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेचे निरीक्षक श्री. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शांताराम जोरे, प्रशांत बोरकर, नितिन ढोमणे, बाळू पालकर , सत्यजित दरेकर, अतुल कांबळे आणि वनविभागाचे कर्मचारी गौतम कांबळे, राहुल गुंठे यांनी ही संयुक्त कारवाई केली.