रत्नागिरी:- राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या चार दिवसात 67 रुग्ण सापडले. त्यातील 43 रुग्ण खेडमधील असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापराची सक्ती करण्यात आली आहे. मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस यांच्यावर धाडी टाकून गर्दी नियंत्रित ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत उद्यापासून कडक निर्बंध घालण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याने ही दुसर्या लाटेची चाहूल असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार उपमुख्यंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना सतर्कता बाळगण्याची सूचना दिली आहे.रत्नागिरीतही गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढली आहे. खेड तालुक्यातील एका गावात एकाच दिवशी27 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने प्रशासन हादरले. बुधवारीही (ता. 17) 23 रुग्ण सापडल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.या पार्श्वभूमीवर लोकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर सक्तीचे करण्यात आले आहे. लग्न सराईसह, अन्य मोठे समारंभ सुरू असून लोकांची गर्दी वाढताना दिसत आहे. म्हणून मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेस यांच्यावर धाडी टाकून मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देत मास्क न लावणार्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. पुन्हा-पुन्हा या चुका होत असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आहेत.