कोरोनाचा नवा घातक स्ट्रेन ‘हॅप्पी हाय फॉक्सिया’चा रत्नागिरीत शिरकाव; तरुणांना अधिक धोका

रत्नागिरी:- कोरोनाची लस घेतली म्हणजे कोरोना आपल्यापासून दूर होणार नाही. त्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करतानाच सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. नव्या स्ट्रेनमध्ये कोरोना झाल्यानंतर तीन-चार दिवसातच फुफ्फुसात संसर्ग होऊन प्रकृती गंभीर होत आहे. तरूण मुले कोरोना अंगावर काढत असल्याने त्यांची मृत्यूसंख्या वाढत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. ‘हॅप्पी हाय फॉक्सिया’मुळे अचानक चक्‍कर येऊन पडण्याचे प्रकार तरुणांमध्ये वाढत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नवी स्ट्रेन घातक आहे. यापूर्वी चौदा ते पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर रुग्ण मृत्यूमुखी पडत होता. मात्र सध्या सात-आठ दिवसांतच रुग्ण गंभीर होऊन मृत्यूमुखी पडत आहे. हवेतून थेट फुफ्फुसात संसर्ग होत असल्याने धोका वाढला आहे. ताप, सर्दी, खोकला झाल्याचा संशय आला तरी तत्काळ स्वॅब टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यादृष्टीने उपचार झाल्यानंतर रुग्ण बरा होऊन घरी जाऊ शकतो. परंतु सुरुवातीला लक्षणे दिसून सुध्दा घरगुती किंवा स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले जातात. त्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची टेस्ट केली जाते. तोपर्यंत फुफ्फुसामध्ये संसर्ग सुरू झालेलाअसतो.

सध्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. प्रामुख्याने तरुणवर्ग सुरुवातीला आजार व लक्षणांकडे दुर्लक्ष करीत असतो. औषधांमुळे सुरुवातीला बरे झाल्यासारखे वाटते. परंतु चार-पाच दिवसांनी अशक्‍तपणा येऊन चक्‍कर येऊन पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. याला ‘हॅप्पी हाय फॉक्सिया’ असे म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यात प्रकृती गंभीर होऊन, फुफ्फुसाला संसर्ग वेगाने होतो. ऑक्सिजनची मात्रा कमी होती. यात रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असल्याचेही डॉ. फुले यांनी सांगितले. नागरिकांनी न घाबरता टेस्ट करून घेतली पाहिजे तरच उपचार तातडीने व योग्य पध्दतीने करता येणे शक्य होणार आहे.नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहेच, परंतु लसीकरण हे कोरोनापासून वाचण्याचा मार्ग नाही. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे. मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, असे डॉ. फुले यांनी सांगितले. प्रशासन, आरोग्य विभाग रुग्णांची काळजी घेण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही त्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे