रत्नागिरी:- ‘लॉटरी लागली आहे’, ‘कर्ज हवे का ?’ असे सांगून ऑईनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीने रत्नागिरीला लक्ष्य केले आहे. गेल्या दोन महिन्यात सात ते आठ गुन्हे दाखल झालेले असतानाच अशाच एका टोळीने बजाज फायनान्स मार्फत लाखो रुपयांचे कर्ज देतो, असे सांगून शिरगाव मधील महेश गोविंद बाणे यांच्यासह १४ जणांची सुमारे ८ लाख ६१ हजार रु.ची फसवणूक केली आहे.
रत्नागिरी येथील राहणारे महेश बाणे यांना नोव्हेंबर महिन्यात प्राची देसाई नावाच्या महिलेने फोन करून बजाज फायनान्स मधून तुम्हाला कर्ज पाहिजे आहे का? अशी विचारणा केली त्यावेळी बाणे यांनी आपल्याला कर्ज हवे असे सांगितल्यावर संबंधित महिलेने तुमच्याशी आमचे साहेब नितीन पाटील बोलतील असे सांगितले. त्यानंतर पाटील नाव सांगणार्या इसमाने फोन करून बाणे यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे मागवून घेतले व त्यांना अठरा लाखांचे कर्ज मंजूर केल्याचे पत्र दिले व सर्व प्रोसेस पूर्ण करण्यासाठी काही रक्कम भरण्यास सांगितले. रिक्षा व्यावसायिक असलेल्या बाणे यांनी कर्जाबाबत आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली त्यानंतर बाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बजाज फायनान्समध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर आठ लाख एकसष्ठ हजार रुपये भरले. परंतु त्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा झाली नाही याबाबत त्यांनी बजाज फायनान्स कंपनीत चौकशी केली असता अशी कोणतीही व्यक्ती आमच्या कार्यालयात काम करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश बाणे यांनी पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. महेश बाणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नितीन पाटील, प्राची देसाई (रा.मुंबई) यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.