रत्नागिरी:- ऑटोरिक्षा परवाना मिळवताना खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास दोषींवर परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी कारवाईस देखील पात्र असतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यामध्ये शासकीय धोरणानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत तीनचाकी तीन आसनी ऑटोरिक्षा परवाना (परमीट) जारी करण्यात येतात. ऑटोरिक्षा परवान्याकरिता अर्जदार हा सरकारी तथा निमसरकारी, खाजगी कंपनी अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत किंवा उद्योगात नोकरी करत नसावा अशी अट नमूद आहे.याकरिता ऑटोरिक्षा परवाना जारी करताना अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाते. तथापि अर्जदारांकडून वरील अटीची पूर्तता होत नसताना देखील खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन परवाना मिळवला जातो, अशा आशयाच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहेत.
कार्यालयामार्फत ५० हून अधिक परवाना निलंबनाच्या अनुषंगाने नोटीस जारी करण्यात आलेल्या असून टप्याटप्याने दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. ऑटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करताना इच्छुकांनी महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन निर्णय एमव्हीआर ०८१५/प्र.क्र. ३८७ / परि २, दिनांक १८ जुलै २०१७ मधील अटी व शर्तींचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी.









