मृत्यूशी 12 दिवसांची झुंज अखेर अपयशी
लांजा:- एस.टी.बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या लांजा तालुक्यातील शिरवली येथील महादेव गुणाजी कुळ्ये (वय ६८) यांचा मुंबई येथे बुधवारी ११ जून रोजी पहाटे ५.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा हा पहिला बळी ठरला असल्याचे लांजावासियांमधून बोलले जात आहे.
लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थितीत आहे. मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसात लांजा शहरात सर्व्हिस रोड नसल्याने नागरिकांसह वाहन चालकांची प्रचंड गैरसोय झाली होती. सध्या या सर्व्हिस रोडचे काम वेगाने सुरू असले तरी यापूर्वीच ही कामे होणे अपेक्षित होते. लांजा शहरातील रखडलेले महामार्गाचे काम आणि सर्व्हिस रोडच्या कामामुळे मे महिन्यात पडलेल्या पावसात शहरात बिकट अवस्था निर्माण झाली होती.
लांजा तालुक्यातील शिरवली पलीकडचीवाडी येथील रहिवासी असलेले ६८ वर्षीय महादेव गुणाजी कुळ्ये हे शनिवार ३१ मे रोजी लांजा येथे खरेदीसाठी आले होते. मात्र लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात रत्नागिरी-कणकवली या एस.टी. बसची त्यांना धडक बसून ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना तसेच कंबरेवर गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना अधिक उपचारसाठी रत्नागिरी आणि नंतर मुंबई येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, मुंबई येथे उपचार सुरू असताना बुधवारी ११ जून रोजी पहाटे ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे.
सध्या लांजा शहरात वाहनांची असलेली प्रचंड रहदारी, त्यात एकेरी वाहतूक आणि सर्व्हिस रोड नसल्याने बसस्थानक परिसरात होणारा वाहतूक खोळंबा यामुळे अशाप्रकारचा अपघात होण्याची शक्यता याआधीच वर्तविण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळेच महादेव कुळ्ये यांचा बळी गेल्याचे लांजावासियांमधून बोलले जात आहे.