अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
रत्नागिरी:- राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक बसला अपघात होवून देवरुखातील दोन चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनिल साळवी आक्रमक झाले आहे. त्यांनी मालवाहतूक करणार्या एस.टी. गाड्यांच्या सुरक्षिततेचीच भांडाफोड केली आहे. जुन्या प्रवासी बसेसच्या सीट काढून त्या गाड्या मालवाहतूकीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप करत अपघातप्रकरणी परिवहन मंत्री, एस.टी. चे विभागनियंत्रक ट्राफिक इनस्पेक्टर, आगार व्यवस्थापक जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
जुन्या प्रवासी गाड्यांच्या सीट काढून त्या गाड्यांमधून मालवाहतूक केली जाते. 9 ते 10 टन पेक्षा अधिक वजनाची अवैधरित्या मालवाहतूक केली जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष साळवी यांनी केला आहे. चालक मालवाहक गाडीच्या अपघाताला जबाबदार नाहीत. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. या संदर्भात त्यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदनही सादर केले आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.राज्य परिवहनच्या जुन्या गाड्यांची मालवाहतूक करण्याची क्षमता नाही. कोणत्यातरी जीआरचा आधार घेवून कामगारांवर दबाव टाकून त्यांना जबरदस्तीने मालवाहतूक करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर – मेढा मार्गावर दरीत कोसळून झालेल्या अपघातात मालवाहक गाडीचे दोन चालक मयूर पावनीकर व रामकिशन केंडे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही चालक देवरुख आगारातील असून या दुर्घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अपघाताचा गुन्हा चालकांवर दाखल न करता तो संबंधीत अधिकार्यांवर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.









