उर्वरित धरणग्रस्तांना वर्षभरात घरे: मुख्यमंत्री 

चिपळूण:- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धिविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या १० घरांचे आज लोकार्पण होत आहे. त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे, याचे समाधान आहे. यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देणार त्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा. हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. 

तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धिविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी ही ग्वाही दिली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आज आपल्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्देवी लोकांच्या कुटुंबीयांविषयी मनात सहवेदना तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात सिद्धिविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले असे म्हणता येईल. मी भाविक आणि मंदिर न्यासाला धन्यवाद देतो. कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना अशी मदत केली आहे.
तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देतांना आजूबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्या. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित अनियमित पावसामुळे राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य आहे.

मंत्री उदय सामंत यांनी तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करतांना उर्वरित घरांच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपये लागणार असून हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास उर्वरित बाधित कुटुंबांनाही हक्काचा निवारा लवकर मिळू शकेल, असे सांगितले.