राजापूर:- तालुक्यातील विखारेगोठणे येथील एका आंबा बागेत काम करणाऱ्या ५० वर्षीय नेपाळी कामगाराचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नारायण दोवारी थारू (वय ५०, मूळ रा. कपिलवस्तू, नेपाळ) असे मयत कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण थारू हे विखारेगोठणे येथील आनंद प्रभाकर मराठे यांच्या आंबा बागेत गेल्या काही काळापासून कामाला होते. बुधवार, ४ मार्च रोजी दुपारी जेवण केल्यानंतर ते बागेतील पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांतीसाठी झोपले होते. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचा सहकारी सोहन हा त्यांना उठवण्यासाठी गेला असता, नारायण यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले.
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.









