Saturday, May 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राम आळीत तरुणावर जीवघेणा हल्ला; रत्नागिरीत खळबळ

राम आळीत तरुणावर जीवघेणा हल्ला; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. शहरातील एका बँकेबाहेर फुटपाथवर झोपलेल्या फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टीलच्या रॉडने निर्दयीपणे जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश भारती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील ‘राम आळी’ परिसरातील एका बँकेबाहेर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये मंगेश भारती (तोणदे) हे शनिवारी रात्री झोपले होते. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बँकेचा सुरक्षारक्षक स्वप्निल पाटील (वायंगणी) कर्तव्यावर असताना त्याने या व्यक्तीला तिथून उठून जाण्यास सांगितले. मात्र, मंगेश उठण्यास तयार नसल्याने त्यांच्यात वाद झाला.

या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. संतापलेल्या वॉचमनने जवळच असलेला स्टीलचा रॉड उचलून मंगेश भारतीवर बेछूट प्रहार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, संबंधित व्यक्तीच्या डोक्यातून आणि शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेश भारतीला पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या स्वप्निल पाटील याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून, केवळ झोपल्याच्या कारणावरून एखाद्या निराधार व्यक्तीवर असा जीवघेणा हल्ला होणे, याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.