रत्नागिरी शहरात घरफोड्यांचे सत्र; पोलीस यंत्रणा हतबल

रत्नागिरी:- शहरातील घरफोडीचे सत्र सुरुच असून सलग तिसर्‍या रात्री चोरट्यांनी शहरात घरफोडी केली. शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शहरातील अभ्युदयनगर परिसरातील नुतननगर येथे चोरट्यांनी डल्ला मारला. नूतन नगर येथील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख 50 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल लांबवला.

याबाबत सायली झगडे (50, रा. नुतननगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, गुरुवारी पहाटे अज्ञाताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून त्याव्दारे घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील सोन्याचे कानातले व रोख 50 हजार रुपये असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल लांबवला.

शुक्रवारी सकाळी सायली झगडे या घराच्या वरील मजल्यावरुन खालील मजल्यावर आल्या असता त्यांना तेथील बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी करत आहेत. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील छत्रपतीनगर येथील बंद बंगल्याची रेकी करून चोरट्यांनी तो फोडला. यामध्ये सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजार रोकड चोरट्यांनी लांबवली होती. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी चोरट्यांनी शहराजवळील साईनगर येथे तीन बंद घरे फोडली.एका रात्रीत झालेल्या या तीन घरफोड्यांमध्ये कोणती मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे कोणी तक्रार केलेली नव्हती. दरम्यान, शहर पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत असून शहरात झालेल्या घरफोड्यां शोध घेण्यासाठी साळवीस्टॉप,नाचणे, मारुतीमंदिर येथील सीसीटिव्हींचे फूटेज तपासले जात आहेत. त्याआधारे आपण लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळून असा विश्वास शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांंनी व्यक्त केला आहे.