रत्नागिरी:- कोकणच्या विकासाला नवी गती देणाऱ्या आणि रत्नागिरीकरांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असलेल्या रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याचा कालावधी आता अगदी जवळ आला आहे. या विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार असून, त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे उद्योग व पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली टेंडर प्रक्रिया एअरलाइन्स कंपनीने पूर्ण केली आहे. या विमानसेवेसाठी केंद्राच्या संरक्षण विभागाशी प्रवासी वाहतुकीचा अधिकृत करार लवकरच केला जाणार आहे. हा करार होताच विमानसेवेचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार असून, रत्नागिरीकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
रत्नागिरी विमानतळाच्या सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री सामंत यांनी कालच घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना विमानतळ सेवेच्या तांत्रिक व पायाभूत सुविधांबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळाचे काम विहित वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना मिळणार विमानतळ पाहण्याची संधी केवळ विमानसेवा सुरू करणे एवढाच उद्देश नसून, रत्नागिरीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विमान वाहतुकीची ओळख व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या विद्यार्थ्यांनी हे विमानतळ जवळून पाहावे आणि त्यांना विमान प्रवासाचा अनुभव घेता यावा, यासाठी प्रशासन पुढाकार घेत आहे. तरुणाईमध्ये विमान वाहतुकीबाबत उत्सुकता निर्माण करून त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
रत्नागिरीत विमानसेवा सुरू झाल्यानंतर येथील दळणवळण सुलभ होण्यासोबतच पर्यटन, उद्योग आणि रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळेच आता रत्नागिरीकर या विमानसेवेच्या पहिल्या उड्डाणाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.








