मिरजोळे येथे कौटुंबिक वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला

रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे नाखरेकरवाडी येथे एका तरुणाने कौटुंबिक वादातून आई आणि काकावर कोयत्याने हल्ला करून दोघांनाही जखमी केले. ही घटना २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. या हल्ल्यात विशाखा विजय नाखरेकर आणि जयवंत बारक्या नाखरेकर (वय ६५, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. विजय जगन्नाथ नाखरेकर (वय ६०, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी) यांनी याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी विजय नाखरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचा मोठा मुलगा ओंकार घरी आंबा पेट्या भरण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी अभिषेक विजय नाखरेकर (वय २९, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी) याने जिन्याजवळ गवत कापण्यासाठी ठेवलेला कोयता हातात घेतला आणि घरात गेला. तेव्हा घरात त्याची आई विशाखा ही उपासना करत बसलेली होती, तर त्याचे चुलत काका जयवंत नाखरेकर हे देखील घरात होते. अभिषेकने कोयत्याने या दोघांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी अभिषेक नाखरेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. जखमी विशाखा नाखरेकर आणि जयवंत नाखरेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.