मिरजोळेतील तरुणी राहिली गरोदर, प्रियकराचे ठरले दुसरी सोबत लग्न; अडथळा ठरलेल्या प्रेयसीचा काढला काटा

रत्नागिरी:- मिरजोळे येथील युवतीच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील संशयित आरोपी दुर्वास पाटील याच्याबरोबर मृतक तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती गरोदर राहिली. त्यामुळे तिने लग्नासाठी दुर्वासाच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. याच दरम्यान दुर्वास याचेही लग्न ठरले. मात्र आपल्या लग्नात तरुणीचा अडथळा येऊ नये म्हणून दुर्वासने अन्य दोन मित्रांसमवेत तिच्या खुनाचा कट रचला. आरोपी दुर्वासने तिला बारमध्ये बोलवलं. बारच्या रूममध्ये गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिला आंबा घाटात फेकून दिले, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

याप्रकरणी दुर्वास पाटील याच्यासह अन्य दोन जणांनाही अटक करण्यात आली आहे. या तीनही नराधमांची रवानगी न्यायालयाने 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. रत्नागिरी पोलिसांनी संशयित आरोपी दुर्वास दर्शन पाटील (२५ वय वर्षे) याच्यासह विश्वास विजय पवार (41 वर्षे) आणि तिसरा आरोपी सुशांत शांताराम नरळकर (वय 40 वर्षे), या तिघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. दुर्वास पाटील याच्या वडिलांच्या सायली बारमध्येच बसून हा खुनाचा कट रचण्यात आला. यातील अन्य दोन संशयित आरोपींपैकी विश्वास विजय पवार हा बार मॅनेजर आहे. तर तिसरा संशयित सुशांत नरळकर हा दुर्वास पाटील याचा मित्र आहे.

रत्नागिरीत अलीकडे खुनाचे प्रकार वाढले आहेत. चार दिवसांपूर्वीच पोटच्या मुलानेच आईचा धारदार शस्त्राने खून करून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी आहे. असं असताना हे नवीन खून प्रकरण समोर आल्याने अवघा जिल्हा हादरला आहे.

या प्रकरणी मिरजोळी येथील खून करण्यात आलेल्या तरुणीच्या भावाने बहिण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 16 ऑगस्ट रोजी मोठी बहीण ही दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भाड्याच्या रूमवर जाते आहे, असं घरातील माणसांना सांगून गेली. त्यानंतर तिचा फोन बंद येत होता. तिची वाट पाहिली. अखेर रूमवर जाऊनही पाहिले. पण रूमला बाहेरून लॉक होतं.

जवळपासचे नातेवाईक, तिच्या मैत्रीण यांच्याकडेही तिची चौकशी केली. मात्र ती कुठेच मिळाली नाही. तिचे दुर्वास बरोबर असलेले प्रेमसंबंध घरी माहिती होते. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाला मुलीच्या घरच्यांकडून विरोधही नव्हता. दुर्वासाचे लग्न ठरले होते. त्यामुळे आपल्या बहिणीने त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केले असेल, असं वाटत होतं. मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे संशय बळावला.

भावाची आणि घरच्यांची खात्री पटली की दुर्वास यानेच आपल्या लग्नात तरुणीचा अडथळा ठरू नये म्हणूनच तिचे जाणीवपूर्वक अपहरण करून घातपात केल्याचा संशय व्यक्त करणारी तक्रार दाखल केली. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर तपासाची सूत्र हलवून प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात बेपत्ता म्हणून दाखल असलेल्या तरुणीचा खून झाल्याचे उघड झालं.

असा रचला अपहरण आणि खुनाचा कट

दुर्वास पाटील यास तिच्यासोबत लग्न करावयाचे नसल्याने तिचा अडसर दूर करण्यासाठी त्याने संशयित आरोपी विश्वास आणि सुशांत यांच्याशी मिळून कट रचला. मृतक तरुणी हिला रत्नागिरी येथून आरोपी दुर्वास याच्या सायली देशी बारमध्ये बोलावले. त्याठिकाणी बारच्या वरच्या रुममध्ये आरोपी दुर्वास आणि विश्वास यांनी तिचा केबलने गळा आवळून अत्यंत निर्दयीपणे तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आरोपी क्र. ३ सुशांत याने आणलेल्या वॅगनआर गाडीतून खंडाळा येथून संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळील आंबाघाट येथे नेवून घाटाच्या परिसरात फेकून दिला.
गुन्हा दाखल, पोलीस कोठडीत रवानगी

गु.र.नं.३६५/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०३(१), २३८, ६१(२), १३८,१२७ (४), प्रमाणे या तिघांवरही खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त जिल्हा पोलीस बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील करत आहेत.