रत्नागिरी:- बसणी ग्रामपंचायतमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. चंदन रविंद्र बसणकर यांची सलग पाचव्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामसभेने एकमताने हा निर्णय घेतला.
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना श्री. बसणकर म्हणाले, “समाजसेवा हेच माझे ध्येय आहे.” तसेच त्यांनी सर्व ग्रामस्थांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून ग्रामपंचायतीतर्फेही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. श्री. बसणकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गावातील तंटे व वाद सोडवण्यासाठी यापुढेही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या ग्रामसभेस गावच्या सरपंच सौ. समृद्धी मयेकर, उपसरपंच श्री. किशोर नेवरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुमित राणे, श्री. बबन शिंदे, सौ. मानसी पाष्टे, पोलीस पाटील सौ. प्रिया बंदरकर, ग्रामसेवक, श्री. कदम गुरुजी, माजी डी.वाय.एस.पी. श्री. भोसले साहेब, श्री. अनिल मयेकर, श्री. प्रशांत बंदरकर, श्री. गौतम कदम, श्री. बबन राणे, श्री. अनंत मांडवकर, प्रमोद झगडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.









