निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:-इतर देशांमध्ये चौथ्या लाटेची सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने सर्वत्र काळजी घेणे आवश्यक आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता सर्वांनी कोरोनाचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केले.

जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठीचे लसीकरण चालू झाले आहे. याचा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या संपूर्ण लसीकरण समाधान व्यक्त करतानाच पुढील मोहिम यशस्वी करण्यासाठी नियोजन करा अशा सुचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, तालूका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोविड लसीकरणाच्या आठव्या टप्प्यात रत्नगिरी जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील ३२ हजार १४५ मुलं तर ३० हजार ९०२ मुली अशा एकूण ६३ हजार ४७ मुला-मुलींना कोरबेवॅक्सचे लसीकरण करण्यात येत आहे. १५ मार्च २०१० पुर्वी जन्मलेली मुले या लसीकरणासाठी पत्र ठरतील. या मुलांना कोरबेवॅक्स लसीचे दोन डोस देण्यात येणार असून दोन डोस मधील अंतर चार आठवडे इतके राहणार आहे. सध्या बहूतांश शाळांमध्ये परिक्षा सुरु आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी परिक्षा संपल्या बरोबर मुलांच्या लसीकरणाचे काम पूर्ण करावे. त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. लसीकरणाचे प्रमाण वाढवावे अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. २००७ वा त्यापूर्वी जन्मलेले १५ ते १८ वयोगटातील ७१ हजार ७४४ लाभार्थी असून त्यापैकी ४९ हजार ३६२ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांचे प्रमाण ६८.८० टक्के आहे. ३४ हजार ६८९ लाभार्थ्यांनी दूसरा डोस घेतला असून त्याचे प्रमाण ४८.३५ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षावरील एकूण १९ लाख ३२ हजार ६३ नागरीकांचे लसीकरण झाले असून १० लाख ५३ हजार ७६० नागरिकांना पहिला डोस देण्यात आला याचे प्रमाण ९७.४० टक्के तर ८ लाख ७८ हजार ३०३ नागरीकांनी दूसार डोस देण्यात आला याचे प्रमाण ८१.१८ टक्के आहे. सर्व तालुक्यामध्ये खबरदारी डोस घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. जिल्हयात एकूण २० हजार ४०९ नागरीकांनी बुश्टर डोस घेतला.