Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी खालगाव, जाकादेवी, चाफेसह मालगुंड परिसर दोन दिवस अंधारात

खालगाव, जाकादेवी, चाफेसह मालगुंड परिसर दोन दिवस अंधारात

वीज ग्राहकांकडून तीव्र संताप

रत्नागिरी:- तालुक्यातील खालगाव जाकादेवी चाफे मालगुंड परिसर दोन दिवस अंधारात होता. रविवारी संध्याकाळपासून ते सोमवारी उशिरा पर्यंत वीज पुरवठा खंडित झाल्याने शेकडो ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

रविवारी संध्याकाळी वादळी पावसाने तरवळ भागामध्ये मेन लाईनचे काही विद्युत खांब कोलमळून पडल्याची घटना घडली. त्यामुळे रविवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत झाला नसल्याने वीज ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ऑनलाइनची सर्व कामं ठप्प झाली एवढेच नव्हे तर विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद पडल्याने ग्राहकाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले .वीज मंडळाचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत होते मात्र सुमारे २० तास उलटले तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या कालखंडात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इतका विलंब होत असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा तरी काय उपयोग? आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध नाही का ? असाही सवाल ग्राहकानी केला आहे .जाकादेवी खालगाव हे टाउन प्लेस असून या भागात सातत्याने छोट्या-मोठ्या कारणांसाठी ही वीज पुरवठा खंडित केला जातो. कधी कधी जाकादेवी कार्यालयात संबंधित लाईनमन, वायरमन उपलब्ध नसतात.एकूणच वीज मंडळाच्या या कारभारावर ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाहीच, एवढेच नव्हे तर ग्रामीण वीज पुरवठा मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या समन्वय नसल्याचेही ग्राहकाने बोलून दाखवले. वीज पुरवठा खंडित झाल्यावर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्याशी संपर्क केला असता अनेकदा कॉल रिसीव्ह केला जात नसल्याचेही ग्राहकांचे म्हणणे आहे. जाकादेवीत दोन वीज लाईन सुरु असून अनेकदा एक लाईन बंदावस्थेत असते, यावरही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.