रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस दलात बिद्रे होत्या कार्यरत
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस विशेष शाखेतून बदली करुन नवी मुंबई येथे गेलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्विनी बिद्रे यांची नव्या ठिकाणी हजर होण्यापुर्वीच हत्या करण्यात आली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी, बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाने तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत, अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी सुचवणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच तपासातील ढिसाळपणावरही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. या खटल्यात महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, 11 एप्रिल 2025 रोजी सर्व आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे पती आणि मुलीला त्या दिवशी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणी पोलिसांतून बडतर्फ केलेला वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्याच्यासह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर दोषी ठरले आहेत. तर राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींना ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
आरोपी नंबर १ अभय कुरुंदकर याला कलम ३०२ अंतर्गत खून प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी नंबर २ राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी नंबर ३ कुंदन भंडारी आणि आरोपी नंबर ४ महेश फळणीकर या दोघांना कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अश्विनी बिद्रे यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी नंबर २ राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाचा म्हणजेच ३०२ चा गुन्हा कुरुंदकर याने केल्याचे आजच्या निकालातून निष्पन्न झाले. महेश आणि कुंदन भंडारी यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभाग होता. त्यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. दरम्यान, मयत अश्विनी बिद्रे यांचे पती आनंद बिद्रे आज न्यायालयात हजर होते. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार असून यावेळी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
या निकालाकडे रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील पोलिसांचे लक्ष लागून राहिले होते. सरकारच्या वतीने ॲड. प्रदीप घरत यांनी काम पाहिले. पनवेलच्या सहायक पोलीस उपायुक्त तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. तब्बल ९ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरूंदकर दोषी ठरला आहे. दरम्यान, अभय कुरुंदकरवर अनेक आरोप असताना त्याची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते, हे भयंकर असून राष्ट्रपती पदक शिफारस करणाऱ्या कमिटीवर न्यायाधीश संतापले.
अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर अश्विनी बिद्रेचा अमानुषपणे खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे वूडकटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याचाही त्याच्यावर आरोप होता. खुनात कुरुंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती.
७ डिसेंबर २०१७ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली. राजेश पाटील यास १० डिसेंबर २०१७मध्ये जेरबंद केले. दोन्हीही आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी कुंदन भंडारी व महेश फळणीकरला अटक केली होती. अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होत्या. हातकणंगले तालुक्यातील आळते हे त्यांचे मूळचे गाव. अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाने जिल्हा हळहळला होता. खटल्याच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह पोलिस दलाचे लक्ष लागले होते.