रत्नागिरीत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रॉग साईडने रिक्षा चालवून सरकारी बोलेरो गाडीला जोरदार धडक देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह पोलीस कर्मचारी आणि अन्य एक जण असे चौघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, २८ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मारुती मंदिर सर्कल परिसरातून रिक्षा (क्रमांक MH-08-BC-3944) जात होती. या रिक्षाचा चालक संदेश शांताराम गाडेकर (वय ४८, रा. मयेकरवाडी, रत्नागिरी) याने मारुती मंदिर सर्कल फिरून कोकणनगरच्या दिशेने जाणे अपेक्षित असताना, नियमांना बगल देत रिक्षा थेट रॉग साईडने भरधाव नेली. याच वेळी जेल नाक्याकडून साळवी स्टॉपकडे जाणारी सरकारी बोलेरो (क्रमांक MH-12-SQ-2082) आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली.
या अपघातामुळे दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अपघातात मपोहेकाँ/१३५३ शलाका आनंद मयेकर, पोशि/७०२ आंब्रे (दोघेही रत्नागिरी शहर पोलीस ठाणे), आदिल अश्रफ आमदानी (रा. लांजेकर नगर), संदेश शांताराम गाडेकर (रिक्षाचालक) किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या अपघाताची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन प्रभाकर डोमणे यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक संदेश गाडेकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून रॉग साईडने वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.









