रत्नागिरी:- पक्ष बांधणीच्यादृष्टीने आज कार्यकर्ता शिबिराचे आयोजन केले होते. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. परंतु समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची आम्ही तयारी ठेवली आहे. तसे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकारी पक्षाने आम्हाला दिले आहेत, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी मांडली.
रत्नागिरीतील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, हुस्नबानू खलिफे, दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद आणि समन्वयक सुरेश कातकर यांची उपस्थिती होती.
पक्षाची रणनीती आणि राज्यातील व स्थानिक प्रश्नांवर भाष्य करताना रमेश कीर म्हणाले, संविधानाच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन करणे, आगामी निवडणुकांसाठी त्यांची तयारी करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. सध्या कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी आहे आणि त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. देशात चाललेल्या ‘दडपशाहीला’ विरोध करण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणे गरजेचे आहे. राज्यात अनेक भागात महापुराने जमिनीची धूप झाली आहे, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तरीही राज्य सरकार केवळ पंचनाम्यांवर अडकून पडले आहे. राज्य सरकार असंवेदनशील आहे, असा आरोप त्यांनी केला. लोकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकारने तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली.
रत्नागिरीतील स्थानिक प्रश्नांवर बोलताना कीर म्हणाले, स्थानिक समस्या ‘जैसे थे’ आहेत. कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून स्थानिक प्रश्नांविषयी लोकांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रश्नांबाबत काँग्रेस पक्ष म्हणून वेळोवेळी उपोषण आणि येथील शासकीय अधिकाऱ्यांचा देखील पाठपुरावा करत आहे. मात्र, पालकमंत्री विकासात इतके गुंग आहेत की, त्यांना रस्त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही, असा उपरोधिक टोला देखील यावेळी रमेश कीर यांनी लगावला.
प्रशिक्षण शिबिरातून निवडणुकीची दिशा निश्चित : शशांक बावचकर
रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे या उद्देशाने रत्नागिरीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि मते विचारात घेतली जातील. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी त्यांच्या लढ्याला देशातील तरुणांनी खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. तरुणांनी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे निरीक्षक शशांक बावचकर यांनी सांगितले.