शौचालय घोटाळा वाद पेटला; पदाधिकारी-अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेत गुरुवारी सायंकाळी जोरदार राडा झाला. शौचालय घोटाळ्याची कागदपत्र मागण्यासाठी गेलेले उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. २०२१मधील स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या कामांच्या खर्चाचा हिशोब आणि निविदेची कागदपत्रे मागत असताना, अभियंता जाधव यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप उपनगराध्यक्ष तिवरेकर यांनी केला आहे. या प्रकरणाचे पडसाद आता आगामी सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता असून, संबंधित अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी तिवरेकर यांनी केली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेत सध्या शौचालय घोटाळा गाजत आहे. याच विषयावरून उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे सायंकाळी ५ च्या सुमारास पालिका कार्यालयात कामानिमित्त गेले होते. २०२१ साली स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयांच्या दुरुस्तीसाठी जो खर्च करण्यात आला, त्यातील निविदेनुसार कामांच्या तपशिलाची (बायफर्केशन) प्रत त्यांनी इंजिनिअर रोहन डांगे यांच्याकडे मागितली. आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या वेळी तिवरेकर हे डांगे यांच्याशी चर्चा करत होते, त्याच वेळी तिथून बाहेर पडणारे बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांनी अचानक हस्तक्षेप करत तिवरेकर यांना उद्देशून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना समीर तिवरेकर म्हणाले की, “मी जाधव यांच्याशी बोलतही नव्हतो, तरीही त्यांनी पूर्वग्रहदूषितपणातून मला घाण भाषेत शिवीगाळ केली आणि धमकावले. नगरपालिकेत पारदर्शक कारभार व्हावा आणि झालेल्या कामांमधील त्रुटी समोर याव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. मात्र, ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्या मनात भीती असल्यानेच असा प्रकार घडला असावा. रत्नागिरीच्या संस्कृतीला हे वर्तन शोभा देणारे नाही.”

ही घटना घडली तेव्हा नगरपालिकेचा कर्मचारी वर्ग तसेच शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी, पाणी सभापती निमेश नायर आणि अन्य सहकारी नगरसेवक तिथे उपस्थित होते. महायुतीचे सर्व नगरसेवक या घटनेचा निषेध करत असून, रत्नागिरी नगरपालिकेचे वैभव परत मिळवून देण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही तिवरेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपनगराध्यक्षांना झालेल्या या वागणुकीमुळे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष पेटला आहे. येत्या सर्वसाधारण सभेत यतीराज जाधव यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी सर्व नगरसेवकांतर्फे केली जाणार असल्याचे संकेत तिवरेकर यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.