रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. या योजनेचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 8 हजार 47 शेतकरी खातेदारांना लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.
2 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबतचा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. या योजनेतील अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. उपमख्यमंत्री (नगरविकास), उपमुख्यमंत्री (रा.ऊ.शु.) मंत्री (महसूल), मंत्री (कृषी), मंत्री (सहकार) हे सदस्य आहेत तर प्रधान सचिव (सहकार) हे या उपसमितीचे सदस्य सचिव आहेत.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील 8 हजार 47 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यामध्ये तालुकानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 460, दापोली 848, खेड 708, चिपळूण 1150, गुहागर 857, संगमेश्वर 1065, रत्नागिरी 546, लांजा 1173, राजापूर 1240. जिल्ह्यातील अन्य बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांची खाती तपासण्याचे तसेच अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे.









