शिष्यवृत्ती परीक्षा सलग दुसऱ्यांदा पुढे ढकलली 

रत्नागिरी:- पाचवी आणि आठवी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.

यापूर्वी ही परीक्षा 8 ऑगस्टला होणार असे जाहीर झाले होते. पण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेशी क्लॅश होत असल्याने ती 8 ऐवजी 9 ऑगस्ट रोजी होईल असे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे.

अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरस्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणार्‍या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा 9 ऑगस्टऐवजी 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र 12 ऑगस्ट रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेळापत्रकानुसार आठ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार होती. करोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नियमित वेळेनुसार मुळात ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. यंदा एप्रिलमध्ये होणार होती पुन्हा 23 मे रोजी घेण्याचे निश्चित झाले. पुन्हा ती पुढे ढकलण्यात आली. आठ ऑगस्ट तारीख निश्चित केल्याचे परिषदेने 20 जुलै रोजी कळविले होते. यात पुन्हा बदल करत परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्ट रोजी होईल असे परिषदेने मंगळवार 27 जुलै स्पष्ट केले. आता पुन्हा ती 9 ऑगस्ट ऐवजी 12 ऑगस्टला होईल, असे परिषदेने कळवले आहे. परीक्षेचे हॉलतिकीट संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.