वारसांची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी ऑनलाईन पर्याय

रत्नागिरी:- घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिली आहे. महसूल सप्ताहानिमित्त एक ऑगस्टपासून भूमी अभिलेख विभागाने राज्यभर ही सुविधा सुरू केली आहे.

भूमी अभिलेख विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे. कोरोनानंतर ऑनलाईन सुविधांचा वापरही नागरिकांकडून वाढत आहे. नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये, यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला आहे. आता याच्या पुढील पाऊल म्हणजे कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून वारसनोंदीची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मृत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा ऑनलाईन अर्ज संबंधित गावाच्या तलाठ्याकडे जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाईन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असतील, तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील, तर तलाठी त्याची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यात येणार आहे.