लघु पाटबंधारे प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा

रत्नागिरी:- उन्हाचा कडाका वाढला असून, पारा ३७ अंश सेल्सिअवर गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली आहे. जिल्ह्यात ४६ लघु पाटबंधाऱ्यांमध्ये ९७.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून, ४१.१३ टक्के साठा आहे. बाष्पीभवनामुळे आठवडाभरात २.८८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा घटल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत एकूण ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाला अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. या परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन मध्यम धरण प्रकल्प तर ४६ लघुपाटबंधारे धरण प्रकल्प आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसागणिक तीव्र होत आहेत. वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे.

सध्या जिल्ह्यात रत्नागिरीसोबतच चिपळूण आणि खेड या तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत आहे. त्या तीन तालुक्यांतील एकूण १४ गावांतील, ३५ वाड्यांतील १ हजार ९३८ ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची रखरख वाढत असल्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन स्तरावरून धावपळ सुरू झाली आहे. यावर्षी सुरुवातीला रत्नागिरी तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले होते.

तीन तालुक्यात टंचाई

रत्नागिरीतील पाच गावांतील २५ वाड्यांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर चिपळूण तालुक्यात ७ गावांतील ८ वाड्यांत टँकर धावत आहे. खेडमध्ये २ गावांतील दोन वाड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसागणिक जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. परिणामी, पाणीटंचाई उग्र रूप धारण करण्याची चिन्हे आहेत.