राष्ट्रवादीच्या जि.प. गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमताने निवड

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बिरवटकर यांची ही निवड पक्षाच्या जिल्हा राजकारणातील पकड मजबूत करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

अजय बिरवटकर हे केवळ पक्षाचे नेते नसून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेव्हणे आहेत. त्यांनी खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. या अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला, ज्यामुळे त्यांची पक्षातली प्रतिमा अधिक उंचावली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) खेड, दापोली आणि चिपळूण या पट्ट्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. महायुतीतील घटक पक्ष असूनही या भागात पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत पक्षाचे ५ सदस्य निवडून आले असून, जिल्ह्याच्या राजकारणात आता या पाच सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

राज्यात महायुतीचे (भाजप, शिवसेना-शिंदे, राष्ट्रवादी-अजित पवार) सरकार असले तरी, रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर न घेता वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.