रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकही उमेदवार रनप कार्यालयात फिरकला नाही. सलग दुसऱ्या दिवशी उमेदवारी न भरली गेल्याने पाटी कोरीच राहिली.
अनेक वर्ष प्रशासक राज राहिल्या नंतर जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे रत्नागिरीकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच प्रमुख लढत रंगण्याची शक्यता अधिक आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही बाजूने उमेदवारांची देखील नावे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला आहे.
दरम्यान रनपच्य सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मंगळवारी देखील हीच परिस्थिती कायम राहिली. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्जाची पाटी कोरीच राहिली. 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास मुदत असून अंतिम टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.









