रत्नागिरीत शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

मागील २४ तासात गुहागर तालुक्यात सर्वाधिक पाऊस

रत्नागिरी:- मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट असताना पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला. मात्र, सायंकाळ नंतर पावसाने पुन्हा जोर धरला होता. शनिवार पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यातील नद्यांची पातळी अद्याप इशारा पातळीवर असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुहागर तालुक्यात सर्वाधिक 146 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.98 मि.मी. पाऊस झाला असून एकूण 647.80 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारीनुसार मंडणगड- 68.40 मिमी, दापोली- 118.90 मिमी, खेड- 81.40 मिमी, गुहागर- 146 मिमी, चिपळूण- 38 मिमी, संगमेश्वर- 21.60 मिमी, रत्नागिरी – 83 मिमी, लांजा – 55.10 मिमी, राजापूर- 35.40 मिमी इतका पाऊस पडला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून ९ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार दापोली तालुक्यात मौजे आडे आंजली ता. दापोली दहागाव येथे राष्ट्रीय महामार्ग येथे रस्त्याची साईड पट्टी खचली होती. मात्र, वाहतुक सुरळीत सुरू होती. मौजे वनौशी तर्फे पंचनदी येथील मराठी शाळेची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. मौजे आवासी येथील सावित्री शांताराम शेडगे यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे 68 हजार 100 रूपयांचे, मौजे सारंग येथे सुनिता गणू बेंढारी यांच्या घराचे अंदाजे १५ हजार रुपयांचे मौजे शिरखल येथे बाळकृष्ण धानाजी देसाई यांच्या घराचे अंदाजे ८० हजार रुपयांचे, मौजे टाकसुरे येथील देविदास गणपत करमकर यांचे बाथरूमचे व इतर घराचे २ लाख ७३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ग्रामपंचायत करंजारी मुख्य रस्त्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे करजाणी येथील नितीन सुरेश बारदुले यांच्या घरातील सामान वाहून गेल्याने अंदाजे ४० हजार रुपयांचे, मौजे करंजाणी येथील राजेंद्र हरिश्चंद्र पालेकर यांच्या अन्नधान्याचे ७ हजार ४०० रुपयांचे तर मौजे दापोली सारंग येथील जायदा रफिक भारदी यांच्या दुकानात पाणी शिरून अन्नधान्याचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील मौजे मांडवे येथे बाळकृष्ण रेवणे यांच्या घरावर नारळाचे झाड पडून अशंत: नुकसान झाले आहे.

गुहागर तालुक्यात शहरातील ३ घरांमध्ये मध्ये पुराचे पाणी गेल्याने १० लोकांना तसेच ५ घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असल्याने २३ लोकांना अशा एकूण ३३ लोकांना त्यांचे नातेवाईकांकडे स्थलांतरीत केले आहे.तसेच आरे या गावातील नदीकाठावरील २ घरांमध्ये पाणी गेल्याने ४ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यात मौजे कोतवडे येथील शशिकला शांताराम मयेकर यांचा गोठा पावसाने पुर्णतः कोसळून नुकसान झाले. तर मौजे गावखडी येथील श्रीधर धर्माजी कुंभार यांचा गोठा पावसाने कोसळून सुमारे रु. १५ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

राजापूर तालुक्यात मौजे आंबोळगड येथील गगनगिरी मठावरील पत्रे उडून गेल्याने अंदाजे ५० हजार रूपयांचे, मौजे करक पुनर्वसन येथे शुभांगी नरेंद्र गांधी यांचे अतिवृष्टी मुळे घराचे अंशतः अंदाजे नुकसान ५५ हजार रुपयांचे तर मौजे जैतापूर येथे श्रीम. शिल्पा सुभाष मांजरेकर यांचे घराची भिंत पडून अंशत १० हजार रुपयांचे, मौजे – ताम्हाणे येथील संभाजी कानेटकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे अंशतः अंदाजे ७ हजार रुपयांचे, मौजे मोसम येथे पांडुरंग सयाजी कोकरे यांच्या घराची संरक्षित भिंत पडल्याने ८ हजार रुपयांचे, मौजे केळवली येथील उर्मिला उदय कासार यांचे घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंदाजे ८ हजार रुपयांचे तर मौजे कोंड्ये तर्फे सौंदळ येथील रमेश महादेव शिवगण यांच्या घराचे मुसळधार पावसाने अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे कोंड्ये तर्फे सौंदळ येथील मधुकर विठोबा शिवगण यांच्या घराचे मुसळधार पावसाने ५० हजारांचे, कशेळी येथील योगांती शिवाजी बोरकर यांच्या घराचे पावसामुळे अंशतः १० हजार २० रुपयांचे, मौजे जवळेथर (कांबळेवाडी) येथील नामदेव तुकाराम कुवळेकर यांच्या घराची संरक्षक भिंत घरानजिक असलेल्या वहाळातील पाण्याच्या प्रवाहामुळे पडल्याने अंदाजे 8 हजार रुपयांचे, तर मौजे जवळेथर येथील धोंडू शिवराम मोरे यांच्या मालकीची विहीर जामदा नदी पात्रातील पाणी पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने कठडे वाहून गेल्याने अंदाजे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मौजे मोसम (बनवाडी) युसूफ पावसकर यांच्या घरामध्ये पाणी शिरून ११ हजार रुपयांचे तर मौजे केळवली येथील अलाऊद्दीन पावसकर यांच्या घराच्या पाण्याच्या टाक्या वाहून गेल्याने अंदाजे ८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.