रत्नागिरी:- ड्रोन तयार करणारी आरआरपी नावाची कंपनी रत्नागिरीत दोनशे एकर जागेवर प्रकल्प उभारणार असून, सोलरमध्ये असणारे सेल तयार करणारा प्रकल्पही येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, रत्नागिरीत नवीन उद्योग येत आहेत. प्रदूषणमुक्त उद्योग आणण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रोन तयार करणारा प्रकल्प रत्नागिरीत आणण्याबाबत चर्चा झाली असून, आरआरपी या प्रकल्पाच्या मालकांनी तशी तयारी दर्शवली आहे. सुमारे दोनशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प येणार आहे. त्याचप्रमाणे सोलार यंत्रणेमध्ये वापरण्यात येणारे सेल तयार करणारा उद्योगही या ठिकाणी येणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
मतदार संघात व्हीआयटी ही सेमीकंडक्टर बनवणारी कंपनी येत असून त्यातून हजारो रोजगार उपलब्ध होणार आहेत. या कंपनीने 16 कोटी रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. 31 कोटी रुपये येत्या काही दिवसात जमा करतील. त्यानंतर खर्या अर्थाने कंपनीच्या पायाभूत सुविधांच्या कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितले.