Friday, June 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहरातील जलवाहिनी ठरतेय डोकेदुखी

रत्नागिरी शहरातील जलवाहिनी ठरतेय डोकेदुखी

आठवड्यातून तीनदा फुटली, हजारो लिटर पाणी वाया

रत्नागिरी:- शहारतील सुधारित पाणी योजनेच्या २ किलोमीटरच्या जलवाहिनीचे अवघड जागेचे दुखणे अजूनही कायम आहे. वाहिनी फुटली नाही, असा एक आठवडा दाखवा, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या आठवड्यात शहरात तीनवेळा वाहिनी फुटल्यामुळे पालिकेवर अतिरिक्त कामाचा भार पडला आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

शहरातील पाणी योजनेसाठी टाकलेली वाहिनी निकृष्ट दर्जाची असल्यामुळे दुरूस्ती केलेल्या ठिकाणीही ते वारंवार फुटत आहेत. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील भाग, सार्वजनिक बांधकाम विभागापुढील जयस्तंभ येथे आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी ही वाहिनी वारंवार फुटत आहे. मागील आठवड्यात एकदा नव्हे तर तीनवेळा ही वाहिनी फुटली. सुरवातीला बसस्थानकासमोर पाईप फुटला. त्याची दुरूस्ती करण्यासाठी पालिकेला रस्ता खोदावा लागला. हे काम करेपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. तेथील दुरूस्ती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसात जयस्तंभ येथे वाहिनी फुटली. त्याची दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयासमोर ही जलवाहिनी फुटली. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पालिका त्रस्त झाली आहे. भरउन्हात खोदाई करून दुरूस्ती करावी लागत आहे.


देखभाल दुरूस्तीसाठी साडेचार लाख
शहरातील जिल्हा परिषद साठवण टाकी ते मांडवी परिसरातील २ किमी नवीन मुख्य वाहिनी खराब असल्याचा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिला आहे. ही पाईपलाईन वारंवार फुटत असून, योजनेच्या देखभालीसाठी ठेकेदाराने नकार दिला आहे. त्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी ४ लाख ५४ हजार रुपये पालिकेने तरतूद करून ठेवले आहेत. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन ठेकेदाराची २७ लाख ६४ हजार अनामत रक्कम पालिकेने राखून ठेवली आहे. त्यामधून दुरूस्तीची कामे केली जात आहेत.