अतिक्रमण हटाव मोहिमेला के.सी. जैन नगर येथून सुरुवात
रत्नागिरी:- शहरातील अतिक्रमणाला कोणतीही सुट न देण्याची भूमिका रत्नागिरी नगर परिषदेने घेतली आहे. के.सी. जैन नगरातील विकास योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यावर असलेले पत्र्याचे गाळे काढण्याबाबतची कार्यवाही सुद्धा सुरु झाली आहे.
नुतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हे अनधिकृत गाळे काढण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. कोकण नगर येथील रस्त्याकडेचे अनधिकृत गाळे शुक्रवारपासून हटवण्यास सुरुवात होणार आहे. नगर परिषदेसह सार्वजनिक बांधकाम आणि विमानतळ प्राधिकरण संयुक्तपणे ही कारवाई करणार असल्याचे नगर अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.
शहराच्या के. सी. जैन नगरात विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यामध्ये सहा पत्र्याचे गाळे आहेत. या गाळ्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, रत्नागिरी नगर परिषद आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही गेल्या चार वर्षात स्थानिकांकडून तक्रारी झाल्या. परंतू नगरपरिषदेतील प्रशासक काळात याबाबतीत कारवाई करण्याकडे दुर्लक्ष झाले. आता हे गाळे हटवण्यासाठी नुतन नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरातील रस्ते, गटारे, फुटपाथवर केलेली अतिक्रमणे स्वतःहून काढण्यासाठी रत्नागिरी न. प. कडून जाहीर नोटीस काढली होती. कोकण नगरातील काही व्यावसायिकांकडून काहीअंशी प्रतिसाद मिळाला. परंतू पुर्ण प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारपासून पोलिस बंदोबस्तात कोकण नगरातील अतिक्रमण हटवण्यास सकाळपासूनच प्रारंभ होणार असल्याचे नगर अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.
शहराच्या के. सी. जैन नगरात असलेले पत्र्याचे गाळे हटवण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर झाल्यानंतर पुढील अपेक्षीत कारवाई केली जाणार आहे. याठिकाणी टेलर, लॉन्ड्री, सलुन व इतर दुकाने आहेत. अतिक्रमण हटावची कारवाई शुक्रवारपासून सुरु होत असल्याने अतिक्रमणाला कोणतीही सुट न देण्याच्या मनस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असल्याचे स्पष्ट होत आहे.









