रत्नागिरी:- शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळी दोन तळीरामांनी ठिय्या मांडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मद्यधुंद अवस्थेतील दोघांपैकी एकजण रस्त्याच्या मध्यभागी निवांत बसला होता तर दुसरा मद्याच्या नशेत स्वतःच्या धुंदीत रस्त्याच्या मधोमध फिरत होता. त्यामुळे या गजबजलेल्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
घटनास्थळी उपस्थित काहीजणांनी या प्रकाराची करमणूक म्हणून पाहिले; मात्र महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या प्रकारामुळे मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या मुख्य रस्त्यावर त्या वेळी वाहतूक पोलिस अथवा संबंधित यंत्रणा दिसून आली नाही. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक प्रभावी गस्त घालण्याची आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









