रत्नागिरी नगर पालिकेवर ३३ कोटींचा आर्थिक बोजा

विकासकामांवर परिणाम; ठेकेदार देखील संकटात

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पालिका सुमारे ३३ कोटीच्या आर्थिक बोजाखाली दबली आहे. यामध्ये विविध योजना आणि विकास कामांच्या १० टक्के रकमेसह पालिकेच्या विविध विभागांच्या कामाच्या देयकांचा समावेश आहे. याचा शहरातील भविष्यातील विकास कामांवर मोठा परिणाम होणार आहे. पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

रत्नागिरी पालिकेवर दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. यापूर्वी देखील माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्या कारकि‍र्दीमध्ये मंजूरीच्या अंतरावर विविध कामांना मंजूर देऊन विकास कामे करण्यात आली होती. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी तेव्हा शहरात विकास कामांचा धाडाका लावून जनमत वळवण्याचा प्रयत्न केला होता. मंजूरीच्या अंतावर करण्यात आलेल्या भरमसाठ कामांमुळे पालिकेवर ३२ कोटींचा आर्थिक बोजा होता. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आर्थिक बोजा असल्याने माझ्या परवानगीशिवाय कोणतेही विकास कामे करू नये, असे आदेश पालिकेला बजावले होते. निवडणुकीनंतर युतीची सत्ता आली आणि तेव्हा अभ्यासू नगराध्यक्ष म्हणून मिलिंद कीर यांना संधी मिळाली होती. त्यांनी अडीच वर्षांमध्ये पालिकेची आर्थिक बोजातून सोडवणुक केली होती. आता पुन्हा तिच री ओढली गेली आहे.

पालिकांवर गेली चार वर्षे झाली प्रशासकाची नियुक्ती आहे. त्यामुळे शासकीय विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे घेण्यात आली. पालिकेची आर्थिक परिस्थिती नसताना मोठ-मोठी कामे करण्यात आली. यामध्ये सुमारे ६८ कोटीच्या पाणी योजनेचा समावेश आहे. त्याचे १० टक्के पालिकेला भरावे लागले. त्यामुळे तो ६ ते ७ कोटीचा बोजा पालिकेवर होता. त्यानंतर लगेच शहरात मुख्य रस्त्यांसह सहा रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे १०० कोटींचे काम मंजुर झाले. यासाठी पालिकेला समारे १० कोटी रुपये भरावे लागले. त्यानंतर पालिकेतील विविध विभागाची विकास कामे सुरूच ठेवण्यात आली. त्यांची देयके थकली आहेत, ठेकेदारांची देयके थकली आहे. त्यामुळे पोलिकेवर गेल्या तीन वर्षांमध्ये आतापर्यंत ३३ ते ३४ कोटी रुपयाचा आर्थिक बोजा पडला आहे.

शासनाच्या विविध योजनांमधुन शहरात विकास कामे झाली आहेत. या कामांचे सुमारे १८ कोटी रूपये येणे बाकी आहे. शासनाचे हे पैसे कधीही येतील त्यामुळे पालिकेवरील १८ कोटींचा बोजा कमी होणार आहे. ही एक बाब मोठी दिलासा देणारी आहे.