नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी आॕनलाईनचा वापर करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दी करुन संभ्रम निर्माण करु नये. जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी गॕस सिलेंडरचा साठा आणि सुरळीत पुरवठ्याबाबत माहिती देवून नागरिकांना आवाहन केले आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. जिल्ह्यात जवळपास 27 गॅस एजन्सीज आहेत. त्या सर्वांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांची बैठक देखील घेतली आहे. जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी यांच्याकडूनही मी माहिती घेतली आहे. गॅस कंपन्यांचे जिल्ह्यासाठी असणारे नोडल अधिकारी यांच्याशी देखील माझं बोलण झालं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस पुरवठा सुरळीत सुरु आहे. चांगल्या पध्दतीने तो पुरवला जातोय. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गॅस एजन्सी मध्ये बुकींगसाठी गर्दी करु नये. अशा गर्दींमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो.
गॅस एजन्सीज् 24 तास काम करीत आहेत. विनाकारण होणाऱ्या गर्दीने त्यांच्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडर बुकींग आॕनलाईन करावे. काही समस्या असल्यास जिल्हा प्रशासनाला कळवावे. जिल्ह्यामध्ये कुठेही गॅस सिलेंडरची समस्या नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करु नये. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.









