२० दिवसात काम सुरू न झाल्या म्हैशी आणून बसवणार
रत्नागिरी:- अरे या सरकारचे करायचे काय, अरे या आमदारांचे, खासदारांचे करायचे काय. खाली डोके वर पाय अशा घोषणा देत गेली सहा वर्षे रखडलेल्या हायटेक एसटी बसस्थाकाच्या नवीन बांधकामाविरुद्ध मोर्चा काढला. यावेळी म्हैसींचे प्रतिकात्मक मुखवटे दाखवून सर्वांचा निषेध व्यक्त केला. येत्या २० दिवसांमध्ये काम सुरू झाले नाही, तर या बांघकामाच्या जागेवर म्हशी आणून या कामाचा गोठा केल्याचे घोषित केले जाईल, असा निर्वानीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला.
मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, शहरअध्क्ष अद्वैत कुलकर्णी , कामगार सेनेचे सुनिल साळवी, श्री. वंडकर, मनिष पाथरे, अमोल श्रीनाथ, छोटु खामकर, श्री. चव्हाण आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृहाजवळून हा मोर्चा काढण्यात आला. सिव्हिल, पालिका, जिल्हाकारी कार्यालयावरून हा मोर्चा हायटेक एसटी बसस्थानकाच्या ठिकाणी मोर्चा आणण्यात आला. यावेळी एसटीचे अभियंता श्री. मोहिते, श्री. पाटील उपस्थित होते. शहर पोलिसांनी येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात जमावबंदी लासू असली तरी मोर्चाला प्रांताधिकाऱ्यांनी रितसर परवानगी दिली होती. विभाग नियंत्रकांनी आज येथे उपस्थित रहायला हवे होते. परंतु आता काही नाही, पुढच्यावेळी त्यांना आम्ही प्रोटोकॉल काय असतो ते बरोबर शिकवू, असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला.
रत्नागिरी हायटेक एसटी बसस्थानकाचे मागील २ वर्षापासून कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून जनतेच्या असंतोष वाढत चालला आहे. कारण प्रवाशांना एन पावसात बाहेर उभे राहून एस.टी.ची वाट बघावी लागत आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय ही अतिशय गंभीरबाब आहे. रखडलेल्या या प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकशाहीच्या मार्गान आज मोर्चा काढुन शासनाचे लक्ष वेधले आहे.
यावेळी म्हैशींचे प्रतिकात्मक मुखवठे दाखवून या कृतीचा निषेध करण्यात आला. सर्वच लोकप्रतिनिधींवर अनेक आरोप करत आगपाखड केली. त्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. येत्या २० दिवासांमध्ये बसस्थानकाचे काम सुरू झाले नाही, तर या ठिकाणी म्हैशी आणून या कामाचा सर्वांनी गोठा केल्याचे जाहिर करू, असा इशारा मनसेने दिला.
आपल्या सर्वांसाठी ही लाजिरवानी बाब आहे, आमदार, खासदार नव्हे तर मंत्री आपले आहेत. परंतु गेल्या सहा वर्षांमध्ये आमदार पळविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र जनतेच्या जिव्हाल्याच्या एसटी बसस्थानकाचा विषय निधी अभावी रखडतो हे रत्नागिरीकरांचे सर्वांत मोठ दुर्दैव आहे. – वैभव खेडेकर, मनसेचे कोकण संघटक