मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाज काढणार भंगारात

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी अडकलेले बसरा स्टार जहाज स्क्रॅप (भंगारात काढून) करून किनारा मोकळा करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या ३ जूनला हे जहाज अडकून दोन वर्षे पूर्ण होतील. तरी या जहाजाच्या एजन्सीने ते काढण्याच्यादृष्टीने अपेक्षित पुढाकार न घेतल्याने ही प्रक्रिया लांबली. आता भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीच्या काही परवानग्या घेऊन हे जहाज भांगारात काढले जाणार आहे. चार दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. स्थानिक उद्योजकांनी हे जहाज भंगारात काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 
बसरा स्टार हे तेलवाहू जहाज तांत्रिक बिघाडामुळे मिरकरवाड्यापासून काही अंतरावर आत नांगरून ठेवले होते. या दरम्यान निसर्ग चक्रीवादळ आले आणि त्याचा तडाखा बसून जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले. जहाजावरील कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक आपत्ती यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले; मात्र जहाजामधील ऑईलगळती होऊन किनार्‍याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ते
टाळण्यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला नोटीस बजावली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑइल काढण्यास सुरवात झाली. ३५ बॅरल म्हणजे सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर ऑइल काढण्यात आले. त्यानंतर लगोलग जहाजामधील सुमारे २५ हजार लिटर डिझेलसाठा सुरक्षित काढण्यात आला आहे. मिर्‍या किनाऱ्यावर रुतलेले जहाज दगडी धूपप्रतिबंधक बंधार्‍यावर आपटून त्याचे मोठे नुकसान झाले. किनारा सुरक्षिततेच्या दृष्टीने जहाज काढा, स्क्रॅप करा पण काहीतरी निर्णय घ्या, असा अल्टीमेटम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ.
संजय उगलमुगल यांनी जहाज एजन्सीला दिला आहे; मात्र संबंधित एजन्सीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

 
दोन वर्षे व्हायला आली तरी त्याला जहाज एजन्सीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आणि पावसाळी वातावरणामुळे जहाज भंगारात
काढण्याचा निर्णय झाला. त्यासाठी स्थानिक उद्योजकांसह गोव्यातील काही शिपिंग कंपनीशी संपर्क सुरू होता. जहाज भंगारात काढण्यासाठी
भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीच्या तांत्रिक मंजुरींची गरज आहे. त्यानुसार मेरीटाईम बोर्डाने प्रस्ताव सादर केला आहे. या परवानग्या मिळाल्या की, येत्या काही दिवसांमध्ये जहाज भंगारात काढण्याचे काम सुरू होणार आहे. स्थानिक उद्योजकांनी हा ठेका घेतल्याचे समजते. येत्या पावसाळ्यापूर्वी मिऱ्या किनारा रिकामा करण्यात येणार आहे.