महावितरणची जिल्ह्यात तब्बल ५७ कोटींची थकबाकी

रत्नागिरी:-महावितरण कंपनीच्या वीज बिल थकबाकीने कंपनीची चिंता वाढविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५७ कोटी ३७ लाख थकबाकी आहे. दोन वर्षात निसर्ग आणि तौक्ते वादळामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे आता शक्य नाही. थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिला. 

जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ००४ ग्राहकांनी आपले वीज बिल भरलेली नाहीत. यामध्ये खेड विभागातील ४३ हजार ४६७ ग्राहकांकडे १४ कोटी ३६ लाख, चिपळूण विभागात ४३ हजार २४२ वीज ग्राहाकांकडे १५ कोटी ३८ लाख, तर रत्नागिरी विभागातील ८९ हजार २९५ वीज ग्राहाकांकडे २७ कोटी ६२ लाख एवढी रक्कम थकीत आहे.
महावितरण कंपनीने वीज देयके अचूक मिळण्यासाठी एसएमएस, मोबाईल ऍप तसेच वेबसाईट मार्फत मीटर रीडिंग अपलोड करण्याची सुविधा दिली आहे. वीज देयकातील दुरुस्त्या तत्काळ करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही परिस्थितीत एकही तक्रार प्रलंबित राहू नये, असेही आदेश सर्व उपविभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. सध्या असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरच्या घरीच देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही पद्धत अत्यंत सुटसुटीत आणि सहज सुलभ आहे. महावितरण कंपनीला सलग दोन वर्ष आलेल्या निसर्ग आणि तौक्ते वादळामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे शक्य नाही. थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर नाईलाजास्तव कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिला.