२५०० जणांची योग्य मोबदल्याची मागणी; चालवणार कोण?
रत्नागिरी:- मिर्या-नागपूर महामार्गाच्या कामाला चांगली गती मिळाली आहे; परंतु रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील दोन ते अडीच अपिलाची प्रकरणे प्रलंबित आहेत. अपिलाची प्रकरणे चालवायची कोणी यावरून वाद सुरू असून या वादात मिर्या-नागपूर महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामापेक्षा मिर्या-नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गासाठी आवश्यक असलेली जागा संपादित करण्याची कार्यवाही सुरू झाली. जागामालकांना नोटीस जारी करण्यात आल्या. रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातून हा महामार्ग जात असून महामार्गाचे ठेकेदारदेखील निश्चित झाले आहेत. पालीपासून साखरपापर्यंत युद्धपातळीवर काम सुरू आहे; मात्र रत्नागिरी ते पालीदरम्यान अपिल दाखल झाल्यामुळे महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे.
राष्ट्रीय महामार्गात ज्यांच्या जागाजमिनी गेल्या अशा जमीनमालकांनी योग्य मोबदला न मिळाल्याने अपिल दाखल केले आहे. तब्बल दोन ते अडीच हजार जमीनमालकांची अपिले दाखल केली आहेत. ही अपिले चालवणार कोण? यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात वाद सुरू आहेत. जिल्हाधिकार्यांनी अशी अपिले अप्पर जिल्हाधिकार्यांकडे चालावावीत यासाठी मंत्रालयात पत्रव्यवहार केला; मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने मिर्या-नागपूर महामार्गाबाबत दाखल झालेली अडीच हजार अपिले प्रशासकीय वादामुळे अडकून पडली आहेत. केंद्र सरकारने महामार्गाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत; मात्र प्रशासकीय वादामुळे अपिलांचा निर्णय होत नसल्याने मिर्या-नागपूर महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. या प्रकरणात पालकमंत्री उदय सामंत यांनी वेळीच लक्ष घालून दाखल झालेली अपिले लवकर निकाली निघावीत यासाठी ठोस निर्णय शासनदरबारी घ्यावा, अशी मागणी होत आहे.