चिपळूण:- रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑगस्टपर्यंतही बंदी जारी राहील.
चिपळूण तालुक्यात अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुण्याहून व जिल्हा-परजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे सवतसडा धबधबा उशिरा प्रवाहित झाला. त्यामुळे अडरेतील धरण आणि सवतसडा धबधब्याकडे पर्यटकांची पावले उशिरा वळली. २३ जुलैपर्यंत येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते; मात्र रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर या दोन्ही ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
महसूल विभागाने याबाबत मनाई आदेश काढले. दोन्ही ठिकाणी जाणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. अडरे येथील धरण परिसर निसर्गरम्य आहे. धरण भरल्यानंतर सांडव्यातून पाणी उलटून बाहेर आल्यावर पुढच्या ठिकाणी नैसर्गिक धबधबा निर्माण झाला आहे. धबधब्याखाली भिजण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण म्हणून अडरेचा धबधबा प्रसिद्घ आहे. मुले व महिलांसाठीदेखील हा धबधबा सुरक्षित आहे; मात्र दोन वर्षांपूर्वी येथे एकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे वर्षानुवर्षे या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर या वर्षीही विरजण पडले आहे.
तालुक्यातील अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन स्थळे पावसाळी पर्यटनासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुण्याहून व जिल्हा-परजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात.