रत्नागिरी:- चिनी समुद्रातील नोरू या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवारे वाहत आहेत. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे कोकणातही पाऊस पडत आहे. दसर्याच्या मुहूर्तावर सुरवात झालेल्या पावसाचा जोर गुरुवारी (ता. 6) दिवसभर होता. रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूरसह लांज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भात कापण्या लांबणीवर गेल्या असून दोन दिवस पाऊस असाच राहीला तर शेतीचे नुकसान होऊ शकते.
जिल्ह्यात गुरुवारी (ता. 6) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 6.89 मिलीमीटर पाऊस झाला. त्यात दापोली 6, खेड 12, चिपळूण 44 मिमी पाऊस झाला. दसर्याच्या दिवशी बुधवारी (ता. 5) सायंकाळी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. देशातील अनेक राज्यांमध्ये दसर्याच्या दिवशी हलका पाऊस झाला. नोरू चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी दिवसभर पाऊस सुरुच होता. त्यामुळे रत्नागिरी शहरात आयटीआय परिसरात पाणी साचले होते. सकाळी सर पडून गेल्यानंतर उन पडले होते. पण साडेअकरा वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरवात झाली. रेनकोट, छत्र्यांशिवाय बाजारात आलेल्या अनेकांना भिजत परतावे लागले. काहींनी चहा टपरीच्या गाडीसह पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी दुकानांचा आसरा घेतला होता. दुपारी काहीवेळ पावसाचा जोर कमी झाला, तोही अल्पावधीसाठी. दुचाकी चालक पावसात भिजताना दिसत होते. या पावसाचा फटका भातशेतीला बसणार आहे. पहिल्या पावसात भात लावणी केलेली पिके आता कापणी योग्य झालेली आहेत. जिल्ह्यात 68 हजार हेक्टरवर भात लागवड झालेली आहे. हळवी भातं (110 दिवस) कापणीसाठी तयार झालेली आहेत. दसर्याच्या मुहुर्तावर काहींनी कापणीही सुरु केली. पण दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे कापणी थांबवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भातखाचरात पावसाचे पाणी साचले आहे. हवामान विभागाकडूनही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कापणी केलेले भात पावसात भिजले तर ते खराब होईल. या भितीने कापणी पुढे ढकलण्यात आली आहे. सतत पाऊस पडत राहीला तर उभी भातं आडवी पडून ती पुन्हा रुजू शकतात. गरवी (135 दिवसांपुढे) भातं पुढील पंधरा दिवसात तयार होणार असल्याने त्यांना पावसाचा फटका बसणार नाही, असे शेतकर्यांकडून सांगितले जात आहे.